'मी तुझ्या पाठीशी आहे' असा दिलासा देणाऱ्या स्वामी समर्थ यांच्याविषयी अनेकांच्या मनात श्रद्धा आहे; पण काही वेळा पारायण, पोथी वाचायला मिळत नसल्याने त्यांचे चरित्र गोष्टीरूपाने लिहून स्वामींची महती व माहिती श्रीकांत गणेश आंबेकर यांनी 'श्री अक्कलकोट स्वामी समर्थ'मधून भाविकांपर्यंत पोचवली आहे.
स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले, असे सांगून त्यांचे वर्णन, त्यांच्या जन्माची कहाणी अवतारीत्वमधून कथन केली आहे.
स्वामींचा स्वभाव कसा होता, त्यांचा नित्यनियम, त्यांनी केलेले चमत्कार, भक्तांची त्यांच्यावरील भक्ती, स्वामींचे त्यांच्यावरील प्रेम, भक्तांच्या अडचणीत त्यांना मदत करणे, आपल्याविषयी वाईट चिंतणाऱ्यांना क्षमा करून त्यांचे भले करण्याची वृत्ती, शिष्यांशी त्यांचे नाते हे छोट्या छोट्या गोष्टींमधून उलगडते.
अशा ३०४ गोष्टी यात असून, स्वामींच्या समाधीची माहिती वेगळ्या प्रकरणात दिली आहे.